मुंबई,दि.५: Raza Academy: जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये काश्मीरी पंडितांवर हल्ले केले जात आहेत. काश्मिरी पंडितांवरील अत्याचार थांबवा अशी मागणी करत मुंबईत रझा अकादमीने (Raza Academy) निदर्शने केली आहेत. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंगमुळे जम्मू-काश्मीरमध्ये अस्थितरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. येथे हिंदू, काश्मिरी पंडितांच्या तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. असे असताना काश्मिरी पंडितांसाठी जे शक्य आहे ते करू अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तर दुसरीकडे रझा अकादमीदेखील काश्मिरी पंडितांच्या बाजूने उभी राहिली असून मुंबईतील मिनारा मशिदीसमोर अकादमीतर्फे निदर्शने करण्यात आली.
रझा अकादमीने काल (४ जून रोजी) जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंग्जचा निषेध केला आहे. अकादमीने काश्मिरी पंडितांना पांठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मिनारा मशिदीसमोर निदर्शने केली. यावेळी रझा अकादमीचे कार्यकर्ते तसेच अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. निदर्शकांच्या हातामध्ये काश्मिरी पंडितांवरील अत्याचार थांबवा,” अशा आशयाचे फलक होते. “काश्मीरमध्ये जो अत्याचार सुरु आहे, तो थांबला पाहिजे. अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करायला हवी,” अशी मागणी यावेळी रझा अकादमीचे अध्यक्ष मुहम्मद सईद नुरी यांनी केली.
दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हत्यासत्राचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. हा अन्याय थांबवण्यात यावा अशी प्रतिक्रिया नेतेमंडळींकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील ही हिंसा थावण्यात यावी. काश्मिरी पंडितांची शक्य होईल तेवढी मदत करु, असे आश्वासन दिले आहे.