अमरावती,दि.26: महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघामधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेळघाटमधील तब्बल 6 गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत मेळघाटमधील 6 गावांनी मतदानावर बहिस्कार टाकल्याची माहिती आहे. सकाळपासून गावातील नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडलेले नाही. यामुळे मतदानाच्या आकडेवारीवर मोठा परिणाम होणार असून याचा फटका नेमका कोणत्या पक्षाला बसणार? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाली असताना आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे. मतदानावर बहिस्कार टाकलेल्या गावांमध्ये रंगबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, आणि खोपमार या गावातील नागरिकांचा समावेश आहे.