जयपूर,दि.29: कुठल्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायक ठरू शकतो. मोबाईलचा अतिवापर अनेकजण करतात. अलीकडच्या काळात मोबाईलचा वापर अति वाढला आहे. मोबाईलच्या व्यसनाची प्रकरणे वारंवार समोर येत आहेत.असाच एक प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे. येथे एका तरुणाला मोबाईलचे इतके व्यसन लागले आहे की, त्याचे भानही गेले आहे. परिस्थिती इतकी बिघडली की आता या 20 वर्षीय तरुणाला त्याच्या घरच्यांनाही ओळखता येत नाहीये. सध्या कुटुंबीयांनी त्याला चुरू येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
मानसोपचारतज्ज्ञ त्याच्यावर उपचार करत आहे. त्याचा सिटी स्कॅन करण्यात आला आहे, त्यानुसार उपचार होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय अकरम पॉवर बाइंडिंगचे काम करतो. वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, गेल्या पाच दिवसांपासून तो झोपलेला नाही. तरुणाच्या काकांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यापासून तो मोबाईलवर जास्त वेळ घालवू लागला. अनेकवेळा असं व्हायचं की तो रात्रभर मोबाईलवर बसायचा. त्याचे व्यसन इतके वाढले होते की त्याने खाणे पिणेही सोडले होते. अकरमच्या आईने सांगितले की, जेव्हा ती त्याला जेवण द्यायला जायची तेव्हा तो बेडवर टाकायचा.
अलीकडच्या काळात मोबाईल व्यसनाची प्रकरणे खूप वेगाने वाढली आहेत. याबाबत जनजागृतीही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. लोकांनी ठराविक वेळेसाठीच मोबाईल वापरावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.