भाजपच्या आमदारासह 14 जणांना अमरावती हिंसाचार प्रकरणी अटक

0

अमरावती,दि.15: अमरावती हिंसाचार प्रकरणी राज्याचे माजी कृषीमंत्री विद्यमान आमदार अनिल बोंडे (anil bonde) यांच्यासह 14 जणांना अटक करण्यात आली आहे. त्रिपुरा कथित हिंसाचार प्रकरणानंतर अमरावतीत पडसाद उमटले होते. रझा अकादमीकडून 12 ऑक्टोबरला शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेला निघाला होता. या मोर्चात जवळपास 15 ते 20 हजार आंदोलक सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चाला नंतर हिंसक वळण लागले होते. यावेळी आठ ते दहा दुकानांची तोडफोड झाली होती. तसेच काही दुकानदारांना मारहाण करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली.

रझा अकादमीच्या मोर्चा विरोधात भाजपने दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला अमरावती बंदची हाक दिली. पण याही बंदलानंतर हिंसक वळण लागलं. या हिंसाचाराच्या घटनांनंतर पोलिसांनी अमरावतीत जमावबंदी लागू केली. संपूर्ण शहरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या घटनांप्रकरणी आता पोलिसांकडून अटकसत्र सुरु झालंय.

अमरावतीमध्ये भाजपने (bjp) 13 नोव्हेंबरला बंद पुकारला होता, त्याला हिंसक वळण मिळाले होते. आता पोलिसांनी धडक कारवाई करत भाजप नेत्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आज (15 ऑक्टोबर) भाजप आमदार आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (anil bonde) यांना अटक केली. बोंडे यांच्यासह आतापर्यंत भाजपच्या 14 नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातून भाजपच्या 14 जणांना अटक केली आहे. या अटक सत्राला आज सकाळी चार वाजेपासून सुरुवात झाली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांच्या या कारवाईवर अनिल बोंडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ज्यांनी 12 तारखेला दंगल केली त्यांना अटक करण्याची यांची हिंमत होत नाही. ज्यांनी या दंगलीच्या विरोधात प्रतिक्रिया दिली, शांततापूर्वक निदर्शने दिली त्यांना अटक करण्याचं सत्र सुरू आहे. मी या अटकेचा निषेध करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आमचा कितीही आवाज दाबला तरी यापुढे हिंदू मार खाणार नाही”, अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here