मुंबई,दि.४: मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि देशांतर्गत अस्थिरतेमुळे पेचात सापडलेल्या पाकिस्तानने अखेर भारतासमोर नमती भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी प्रादेशिक सुरक्षेचा हवाला देत भारतासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून, सैन्य कारवाईऐवजी संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे. संसदेतील त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
भारताची भूमिका: ‘दहशतवाद आणि चर्चा एकत्र अशक्य’
पाकिस्तानने जरी शांततेचा राग आळवला असला, तरी भारताने आपली भूमिका नेहमीच स्पष्ट ठेवली आहे. गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील अविश्वास टोकाला पोहोचला आहे. भारताच्या मते, दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांना जोपर्यंत पाकिस्तान पूर्णपणे लगाम घालत नाही, तोपर्यंत चर्चेला अर्थ नाही.
मैदानावरही तणाव: क्रिकेटमधील कटुता कायम
भारत-पाक संबंधांमधील ही दरी केवळ सीमेपुरती मर्यादित नसून ती क्रीडा क्षेत्रातही स्पष्टपणे दिसते. आशिया कप असो वा वर्ल्ड कप, दोन्ही देशांच्या खेळाडूंमधील देहबोली आणि चाहत्यांच्या घोषणाबाजीवरून तणाव स्पष्ट जाणवतो. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळल्याच्या घटना आणि पाकिस्तानी खेळाडूंनी भारतात येण्यास दिलेला नकार, यावरून हे नाते किती खालावले आहे याची प्रचिती येते.
पाकिस्तानची मजबुरी: चहूबाजूंनी संकटांचा विळखा
राष्ट्रपती झरदारी यांनी भारताकडे मैत्रीचा हात पुढे करण्यामागे मोठी राजकीय आणि लष्करी कारणे असल्याचे मानले जात आहे. सध्या पाकिस्तान अनेक आघाड्यांवर एकाच वेळी संकटात सापडला आहे:
• अफगाणिस्तान सीमा: अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात सातत्याने संघर्ष सुरू आहे.
• बलूच बंडखोरी: बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी थेट पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले आहे.
• इराणचा इशारा: अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी एअरबेस वापरल्याचा दावा इराणने केला असून, याचे गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला आहे.
एकाच वेळी अफगाणिस्तान, इराण आणि अंतर्गत बंडखोरीशी लढण्याची पाकिस्तानची आर्थिक व लष्करी क्षमता शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे भारतासोबतचा मोर्चा शांत करणे ही आता पाकिस्तानची ‘राजनैतिक मजबुरी’ बनली आहे.








