मुंबई,दि.29: महाराष्ट्रात कोराना रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्याही राज्यात वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरीयंटची रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्यात येणार का? असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
राज्यासह मुंबईतही कोरोनासह (Corona Variant Omicron) ओमिक्रॉनचा जोर वाढतोय. दररोज वाढणाऱ्या या आकड्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होईल का, अशी दबक्या आवाजात सर्वसामांन्यामध्ये चर्चा आहे. या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लावणार की नाही, याबाबत कॅबिनेट मंत्री, मुंबई शहराचे पालकमंत्री आणि मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी माहिती दिली आहे.
अस्लम शेख म्हणाले
“राज्यात आणि मुंबईत आम्हाला पुन्हा लॉकडाऊन बघायचा नाही. लॉकडाऊन लोकांवर लादायचा नाही. आम्ही दर दोन चार दिवसांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतोय. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध कडक करतोय. आधी ज्या समारंभांना मोठ्या प्रमाणात परवानगी दिली होती, तिथेही निर्बंध घातले आहेत, कारण आपल्याला रुग्णसंख्या वाढवायची नाही. तसेच रुग्णसंख्ये नियंत्रणात ठेवायची असेल तर, लोकांचीही मदत लागेल, असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा विस्फोट होताना दिसतोय. तर ओमायक्रॉनचा आकडाही दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करावं, असं आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.