पुणे,दि.26: Vikram Gokhale Passes Away: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मागच्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या पोटात पाणी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विक्रम गोखले काही महिन्यांआधीच स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेच्या निमित्तानं विक्रम गोखले अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. विक्रम गोखले यांनी तुझेच मी गीत गात आहे मालिकेत पंडीत मुकुल नारायण ही व्यक्तिरेखा साकारली होती. मालिका लोकप्रिय तर आहेच त्यासोबतच नव्या पिढीबरोबर काम करताना नेहमीच आनंद होतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका अग्निहोत्र मध्ये विक्रम गोखले यांनी मोरेश्वर अग्निहोत्री यांची भूमिका साकारली होती. मोरेश्वर काकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आजही अग्निहोत्र ही मालिका प्रेक्षकांना आवडते.
विक्रम गोखले नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी त्याच्या भारदस्त अभिनयानं सिनेमाला चार चांद लावले. ‘लागलं का पाणी मारूतीच्या पायाला’ संपूर्ण सिनेमात त्यांच्या तोंडी हे एकच वाक्य ऐकायला मिळतं. पण ते एक वाक्य विक्रम गोखले यांनी ज्या पद्धतीनं सादर केलं आहे त्याला तोड नाही. सिनेमातील विक्रम गोखलेंच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 साली पुण्यात झाला. सिनेमा, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांची काम केलं आहे. अभिनयाबरोबरचं त्यांनी लेखन, दिग्दर्शन देखील केलं आहे. अनेक सिनेमांच्या समीक्षण ते करत होते. सध्या ते नवोदित कलाकारांना अभिनयाचं प्रशिक्षण देत होते. ‘एखादी तरी स्मितरेषा’, ‘खरं सांगायचं तर’, ‘जावई माझा भला’, ‘बॅरिस्टर’, ‘सरगम’, ‘स्वामी’ ही त्यांची प्रसिद्ध नाटकं होती. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.