मुंबई,दि.30: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळांच्या भूमिकेवरून मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी उपोषण सोडले. ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसीतून देऊ नये असे ओबीसी समाजाचे म्हणणे आहे.
अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ आरक्षणावरून आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये किती ओबीसी मंत्री आहेत, हे पाहावं लागेल.जे आहेत, ते सत्तेसाठी शेपूट घालून बसले आहेत. परंतु छगन भुजबळ ओबीसी बांधवांच्या हक्कांसाठी भांडत आहेत. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असं जाहीर करताना आमच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, असे विधान राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. राज्यातील विविध ओबीसी संघटनांबरोबर मुंबईत विजय वडेट्टीवार यांची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
विजय वडेट्टीवार यांनी संभाजीनगर येथे 20 फेब्रुवारीला विराट ओबीसी सभा घेण्याची घोषणा केली आहे. सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी शपथ पूर्ण करण्यासाठी ओबीसी समाजला पायादळी तुडवल्याचे वडेट्टीवार म्हणाले. शिंदे समिती शिफारस प्राप्त नाही. कॅबिनेट समोर न जाता, जीआर काढला असे ओबीसी नेत्यांनी म्हटले. सत्ताधारी कुरघोडी करत श्रेयवादाची लढाई करत असल्याचे ते म्हणाले.
संविधानिक बाबी नसतील त्यांना ओबीसी विरोध करणार आहे. 5 फेब्रुवारीपासून ओबीसी नेते आणि समाज बहुजनांच्या स्फूर्तिस्थळी जाणार असल्याचे ते म्हणाले. चैत्य भूमी येथून सुरूवात करणार असून पोहरादेवी, चौंडी, शाहू महाराज समाधिस्थळ यासह वेगवेगळ्या ठिकाणच्या स्मृतीस्थळावर हजारो गाड्या आणि कार्यकर्त्यांसह जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच 20 फेब्रुवारीला संभाजीनगर येथे विराट सभा घेणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.