मुंबई,दि.20: Uddhav Thackeray: तेलंगणचे मुख्यंमंत्री के. चंद्रशेखर राव (Chief Minister Chandrasekhar Rao) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी ‘सुडाचे राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे. आमचे हिंदुत्व हे सुडाचे राजकारण करणे नाही. त्यात देशाचे काय होईल. याचा विचार कुणी तरी करायला हवा होता. तो आम्ही करत आहोत. बदला घेणारे आमचे राजकारण नाही’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
‘मी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं आनंदाने स्वागत केलं. आम्ही बऱ्याच दिवसांपासून भेटणार होतो, आज तो दिवस उजाडला. कालच शिवाजी महाराज यांची जयंती झाली, त्यानंतर आज आमची भेट झाली, आम्ही काही लपवलं नाही, आतमध्ये काही बोलायचं आणि बाहेर आल्यावर नाही नाही सदिच्छा भेट होती असे म्हणायचे’ असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला.
यापुढे देशाचे काय होईल याबाबत विचार व्हायला हवा होता. आता त्याची सुरुवात आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र आणि तेलंगण राज्याची 1000 किलोमीटरची सीमा आहे. या दोन राज्यांमधील संबंध चांगले राहायला पाहिजेत. आमच्या आजच्या भेटीमुळे नव्या विचारांची सुरुवात झालेली आहे. आता देशाच्या मूलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा कारभार मोडून काढायला हवा. आता आम्ही दोघांनी मिळून एक दिशा ठरली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
‘आमची भेट जसे सजंय राऊत यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनीही सांगितले, देशाचे वातावरण गढूळ झाले आहे. अत्यंत खालच्या पातळीला राजकारण सुरू आहे. सुडाचे राजकारण ही काही देशाची परंपरा नाही. आमचे हिंदुत्व हे सूडाचे राजकारण करणारे नाही. त्यात देशाचे काय होईल. याचा विचार कुणी तरी करायला हवा होता. तो आम्ही करत आहोत. बदला घेणारे आमचे राजकारण नाही’ अशी टीकाही ठाकरे यांनी भाजपवर केली.
‘हे जर असेच सुरू राहिले तर देशाचे काय होईल. देशाला काही भवितव्य आहे की नाही, मागील पानावर पुढील पानावर सुरू असेल तर काही खरे नाही. याचा विचार कुणी तरी केला पाहिजे होता. आजपासून आम्ही विचार करायला सुरुवात केली आहे’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.