मुंबई,दि.25: आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरतं मागे घेत असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. “पहिल्या टप्प्यातील एसटी कामगारांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. आम्ही कामगारांसोबत आहोत. सरकारने केलेली वेतनवाढ हा आंदोलनाचा विजय आहे.” असे सदाभाऊ खोत म्हणाले. मात्र एसटी कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा मिटण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पगारवाढीची (Salary Hike) घोषणा केली. पण या पगारवाढीच्या घोषणेनंतरही कामगार संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. एसटी महामंडळाचं जोपर्यंत सरकारमध्ये विलीनीकरण (Merged) होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका कामगारांनी (Workers) मांडली आहे. तर दुसरीकडे सरकारने पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही जे कामगार उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू झाले नाहीत त्यांना कडक कारवाईला (Strict Action) सामोरं जावं लागेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
तुटेपर्यंत ताणू नये
“आम्ही आमचा निर्णय जाहीर केलाय. ज्या कामगारांना तो निर्णय मंजूर असेल ते कामगार कामावर येतील. ज्यांना मंजूर नसेल त्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. कामगारांनी कोणाची लिडरशीप स्वीकारावी हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त मी त्यांना एकच सांगू इच्छितो, तुटेपर्यंत ताणू नये. एकदा तुटलं तर जोडणार नाही. कारवाई आता किती कामगार येतील त्यावर ठरवू. निलंबित झालेले कामगार उद्या आले तर त्यांचे निलंबन मागे घेऊ”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.
“एक गोष्ट नक्की आहे, लढाई कशा पद्धतीने लढायची असते. मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई थांबवायची असते, असे साधारण संकेत असतात. काही कर्मचारी कामावर येऊ इच्छित आहेत. ते आमच्याशी संपर्क साधत आहेत. सातत्याने ते सांगत आहेत की, आम्हाला कामावर यायचं आहे, आम्हाला सुरक्षा द्या. आज मी कामगारांना आवाहन केलं आहे जे कामगार गावी गेलेत त्यांनी कामावर यावं. जे कामगार मुंबईत आहेत त्यांनी उद्यापर्यंत कामावर यावं. आम्ही उद्या सकाळपर्यंत किती कामगार येतात, किती येत नाही या सगळ्याचा अभ्यास करु. त्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की कशाप्रकारे पुढे जायला पाहिजे”, असं परब यांनी सांगितलं.