मुंबई,दि.2: राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोन मंत्री आहेत. राज्य मंत्रिमंळाच्या विस्ताराची तारीख ठरल्याची माहिती समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 5 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नव्हता. एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रेतेची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्याकडे केली होती.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या 16 आमदारांना यासंदर्भात नोटीस बजावली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे गटानी याला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात 3 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांबाबत न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालावर शिंदे गटाची पुढची वाटचाल ठरणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे. 60:40 फॉर्मुल्यानुसार मंत्रिमडळ विस्तार होणार आहे.