न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल ; गतिमंद मुलीवर अत्त्याचारप्रकरणी दिला निकाल

0

भंडारा,दि.1 एप्रिल 2022: गतिमंद मुलीवर अत्त्याचारप्रकरणी न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. DNA चाचणीतून गतिमंद पीडितेला न्याय मिळाला आहे. देशात पहिल्यांदा बलात्काराच्या प्रकरणात DNA चाचणीतून (DNA Test) गतिमंद पीडित तरुणीला न्याय मिळाला आहे. हा प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला. 13 वर्षांपूर्वी बलात्काराच्या घटनेतून जन्मलेल्या मुलीला जन्मापासून लग्नापर्यंत 5 हजार रुपये प्रतिमहिना पोटगी देण्याचा ऐतिहासिक निकाल भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे.

2008 साली भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या “चानला धानला” गावात राहणाऱ्या 19 वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार झाला होता. लाखनी ग्रामपंचायतीचे भाजप पक्षाचे तत्कालीन सरपंच डॉ भिवा धरमशहारे या 65 वर्षीय नराधमाने 19 वर्षीय मुलीवर अत्याचार केला होता. यानंतर पीडितेला 7 महिन्याची गर्भधारणा झाली असता आरोपीने तिचा गर्भपात करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हे प्रकरण लाखनी येथील सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांना माहिती होताच त्यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि पीडित मुलीचे प्राण वाचविण्यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पीडितेला दाखल केलं.

पीडितेने 20 नोहेंबर 2008 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. या संदर्भात आरोपी विरुद्ध लाखनी पोलीस ठाण्यात बलात्काराच्या गुन्हा दाखल झाला . यानंतर आरोपीनं या प्रकरणात 7 वर्षाची शिक्षा भोगल्यावर आंतरिम जामिन मिळवत स्वतःची सुटका करून घेतली. यादरम्यान आरोपीचा लाखनी येथे मृत्यू झाला. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी मुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल केली.

12 डिसेंबर 2012 ला भंडारा जिल्हाधिकरी कार्यालयावर ढिवर समाजाच्यावतीने पारंपरिक वेशभूषेत अर्ध नग्न मोर्चादेखील काढण्यात आला होता. आता तब्ब्ल 13 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. यात पीडित मुलीला आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी प्रतिमहिना 5 हजार रुपये पोटगी मंजूर झाली आहे. आरोपी मृत पावल्याने न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आरोपीच्या संपतीवर 8 लाख रुपयांचा बोझा चढवित ( 13 वर्षे 4 महिने म्हणजे 160 महिने गुणिले 5000= 800000 ) भरपाई देण्यास सांगितलं आहे.

आरोपीच्या कुटुंबीयाने हे पैसे दिले नाही तर यापुढे आरोपीच्या संपत्तीचा लिलाव करून पीडितेला तिचा हक्क दिला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणात लढत असलेल्या वकिलांचादेखील मृत्य झाल्याने सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी स्वतः या प्रकरणात पीडितेची बाजू मांडत, तिला न्याय मिळवून देण्यात मोठी मदत केली आहे .

आतापर्यंत देशात बलात्काराच्या घटनेत कुठेही DNA चाचणीतून गतिमंद पीडितेला न्याय मिळाला नाही, तसंच पोटगी मिळाली नाही. ही देशातील पहिली घटना असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भविष्यात अशा पद्धतीचे गुन्हे घडले तर आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यात हा निकाल मोलाचा ठरेल हे मात्र निश्चित.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here