शर्मिला ठाकरे शिंदे फडणवीस सरकारबाबत म्हणाल्या

0

पुणे,दि.२१: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारकडून अद्याप काहीच चांगलं काम घडलेलं नाही असे म्हणत शर्मिला ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर बोलताना जोरदार टोलेबाजी केली. “माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील,” असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून अद्याप काहीच चांगलं काम घडलेलं नाही, असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारला टोलाही लगावला. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “किमान रस्ते तरी नीट करा. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे झालीत, आता आपण ७५ वर्षे साजरी करत आहोत. महाराष्ट्र राज्य देशाला ४० ते ५० टक्के कर देतो. महाराष्ट्र केंद्राला करातून सर्वाधिक पैसे देतो, मग तुम्ही तुमचं राज्य तर नीट करा.”

“आपले रस्ते चांगले होतील अशी आपण इच्छ व्यक्त करुयात. काम करण्याची मानसिकता हवी. माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच महाराष्ट्रातील रस्ते चांगले होतील, असं मला वाटतं,” असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं.

“आपण कायम आपल्या आयुष्यात काही तरी चांगलं झालं पाहिजे असे चांगले विचार करावेत. अजून तरी काही चांगलं झालेलं नाही, पण आता होईल,” असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोलाही लगावला.

शर्मिला ठाकरे मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीवर बोलताना म्हणाल्या, “नितीन गडकरी घरी आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की वहिनी आजच तुमचं नाव भाषणात घेतलं. मी त्यांना रात्री १२ वाजता फोन करून मुंबई-गोवा रस्त्याकडे बघा, किती खड्डे आहेत, असं सांगितलं होतं. यानंतर नितीन गडकरी यांनी भाषणात माझा उल्लेख केला,” असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.

“माझं म्हणणं असं आहे महाराष्ट्र मागासलेलं राज्य नाही. महाराष्ट्र राज्याची सीमा कोणत्याही बाजूने सोडली तर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, हैदराबाद या सगळ्या ठिकाणी गुळगुळीत रस्ते दिसतात. आपल्याकडेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते का करत नाहीत?” असा सवालही शर्मिला ठाकरेंनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here