ठाणे,दि.29: ज्या ठिकाणी भाजपा (BJP) सरकार नाही त्या ठिकाणी कारवाई होताना पहायला मिळतंय असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ठाण्यातून भाजपावर हल्लाबोल केला आहे. भाजपाकडून (BJP) लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून आतापर्यंत त्यांनी दिलेले आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. 2014 मध्ये निवडणुकीला सामोरं जाताना भाजपने अच्छे दिन अशी घोषणा केली. हे अच्छे दिन कधीच नागरिकांना पाहायला मिळाले नाहीत असाही हल्लाबोल त्यांनी केला. ठाण्यातील बैठकीनंतर शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून दिलेली आश्वासने आणि त्या आश्वासनांसंदर्भातील सध्याची आकडेवारी पवार यांनी पत्रकारांसमोर मांडली. पवार यांनी बिल्कीस बानो, केंद्रीय यंत्रणांचा वापर यासारख्या विषयांवरुनही केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ठाण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण या जिल्ह्यात आमदार जास्त आहेत. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आणि राज्याची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत ते एकाच विचाराचे आहेत. या सरकारकडून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत मात्र ती पूर्ण केली जातायत का हा देखील सवाल आहे.
“केंद्राच्या सत्ताधारी पक्षाने केली. अनेक आश्वासनं देण्यात आलेली आहेत. आश्वासनांच्या पुरततेचा आढावा घेतला तर त्यात समाधानकारक दिसत नाही. 2014 मध्ये निवडणुकीला सामोरं जाताना सत्ताधाऱ्यांनी अच्छे दिनची घोषणा केलेली. किंमती कमी होतील बोलेले होते. त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना जावणले नाहीत,” असा टोला पवारांनी 2014 च्या आश्वासनांसंदर्भात बोलताना लगावला. पुढे बोलताना पवार यांनी, “नंतरच्या निवडणुकीला अच्छे दिनचा विसर पडला नंतर न्यू इंडियाचा विश्वास दिला गेला. आता 2024 संदर्भात फाइव्ह ट्रिलियन इकमॉनमी आम्ही करु असा विश्वास द्यायचा प्रयत्न केला आहे,” असंही म्हटलं.
शरद पवार म्हणाले की, 2022 पर्यंत प्रत्येकाला 24 तास वीज पुरवली जाईल असं देखील आश्वासन दिलं होतं. परंतु ते पूर्ण केलेलं नाही. 44 टक्के देशातील लोकांना अजुनही वीज मिळालेली नाही, ही आकडेवारी केंद्राची आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की जी आश्वासनं देण्यात आली ती पाळली गेली नाहीत.
कुणाच्या पाठी ईडी, सीबीआय लावता येईल का याचा प्रयत्न करण्यात येतोय. ज्या ठिकाणी भाजप सरकार नाही त्या ठिकाणी कारवाई होताना पहायला मिळतंय. विरोधी पक्ष जर सत्तेत असतील तर त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार नव्हतं. परंतु काही आमदार सोबत घेऊन सरकार बनवलं. महाराष्ट्रात देखील असं झालं. मध्यप्रदेशमध्येही हेच झालं.