मुंबई,दि.26: शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई (Shamhuraj Desai) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीवर भाष्य केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 40 आमदार जे एकमताने उठाव करतात त्यांना पालापाचोळ्याची उपमा देणे हे योग्य नाही. पक्ष वाढवण्यासाठी या आमदारांनी योगदान दिले आहे. वेळेप्रसंगी संघर्ष केला आहे. संजय राऊतांची भाषा उद्धव ठाकरे बोलतायेत. हे बोलू नका. तुमच्याबद्दल आदराची भावना आहे अशा शब्दात आमदार शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाष्य केले आहे.
शंभुराज देसाई म्हणाले की, आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांमधील खदखद उद्धव ठाकरेंच्या कानी घातली होती. आमदारांच्या मतदारसंघात जाणीवपूर्वक राष्ट्रवादीकडून त्रास दिला जात आहे. आमदार अस्वस्थ आहेत. किमान 5 ते 10 वेळा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ही आमच्या मनातील खदखद होती असं त्यांनी सांगितले. तसेच बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना वाचवण्याचं काम आम्ही केले. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरुष आहे. त्यांना एका कुटुंबापुरतं मर्यादित करू नये. बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण देशाचे हिंदुह्द्रयसम्राट आहेत असंही त्यांनी म्हटलं.
बाळासाहेब ठाकरे हे देशाचे नेते आहे. बाळासाहेब ठाकरे मोठे झाले ते उद्धव ठाकरेंना पाहावत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत त्यांचे फोटो, पुतळा तुमच्या स्टेजवर नको असं कुणी म्हटलं तर काय होईल. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने, पुण्याईने आम्ही मोठे झालो. तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा ठसा उमटवा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे ही माणसं खूप मोठी आहेत. शिवसेनाप्रमुखांनी छत्रपतींना नमस्कार केल्याशिवाय भाषणाला सुरूवात केली नाही.
शिवसेनाप्रमुखांना छोटे करण्याचा प्रयत्न करू नका असं विधान आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. त्याचसोबत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेही होऊ शकत नाही. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पायाजवळ राहू. शिवसेनाप्रमुखांची बरोबरी करण्याची आमची लायकी नाही. एकवेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरता येणार नाही असा घणाघात आमदार संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला.