सोलापूर,दि.19: भारतीय संघाचा माजी खेळाडू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्प्यात होत आहे. उद्या (दि.20) पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील मुंबईतील सर्व लोकसभा मतदार संघात उद्या मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हा टप्पा राज्यातील शेवटचा टप्पा आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगापासून राजकीय पक्ष काम करत आहेत.
जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी व नवमतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अशातच सर्वांनी मतदान करावे यासाठी सचिन तेंडुलकरने सोशल मिडीयावर पोस्ट करत आवाहन केले आहे. “सामन्यात, प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमीच जिंकत नाही पण लोकशाहीत ते नेहमीच होते” असे सचिन तेंडुलकरने ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’च्या माध्यमातून सचिन तेंडुलकरने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तो म्हणाला की, एखाद्या सामन्यामध्ये प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमीच जिंकेल असे काही नाही. पण, लोकशाहीत हे असेच घडत असते. अर्थात लोकांनी ज्याला सर्वाधिक मतदान केले असते त्याचा विजय होत असतो. म्हणूनच आपण लोक म्हणून किती सामर्थ्य आहे हे दाखवूया… चला मतदान करूया.