दि5: रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) अनेकजण युक्रेन सोडून जात आहेत. भारतीय तरुणाने पाकिस्तानी तरुणीचा जीव वाचवला आहे. यामुळे भारतीयांचा मोठेपणा दिसून येत आहे. हरियाणाचा अंकित कीव्ह पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये युक्रेनी भाषेचा विद्यार्थी आहे. 25 फेब्रुवारीला मध्यरात्री 2.30 वाजता इन्स्टिट्यूटपासून तीन किमी अंतरावर स्फोट झाला. त्यानंतर 80 विद्यार्थ्यांना बंकरमध्ये पाठवण्यात आले. त्यात अंकित एकटा भारतीय होतो. तेथे असलेली मारिया ही पाकिस्तानी मुलगी खूप घाबरलेली होती. सतत स्फोट होत असल्याने अंकितने तेथून निघण्याचा निर्णय घेतला. मारियानेही सोबत येऊ देण्याची विनंती केली.
अंकितने मारियाला सुखरूपरित्या रोमानिया बॉर्डरवर पोहोचवलं आहे. पाकिस्तानी दूतावासाने अंकितचं भरभरून कौतुक केलं आहे. “भारतीय असलेल्या अंकितने आमच्या मुलीला आमच्याकडे आणलं आणि आमची मुलगी वाचली आहे. बेटा! खूप खूप धन्यवाद. दोन्ही देशातील जनतेने एकमेकांचे पाय खेचण्याची नाही, तर प्रेम आणि पाठिंबा दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्या द्वेषापेक्षा आपली मुलं महत्त्वाची आहेत” असं म्हटलं आहे.
दैनिक भास्करने अंकितशी संवाद साधला असता त्याने याबाबत माहिती दिली आहे. मारियाच्या कुटुंबियांशी फोनवर बोलणं झालं आणि 28 फेब्रुवारीला आम्ही दोघं पायी चालत कीव्हच्या बुगजाला रेल्वे स्टेशनला निघालो. दोन दिवसांपासून काही खाल्ले नव्हते. तिला चालता येत नव्हतं. मी तिचं सामान घेतलं आणि गोळीबार टाळण्यासाठी 5 किमी पायी चालत स्टेशनवर पोहोचलो. तिथे खूप गर्दी होती. तीन ट्रेन मिस झाल्या” असं अंकितने म्हटलं आहे.
अंकितने सांगितलं की, “त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता तो कसा तरी ट्रेनमध्ये चढला. तासाभराच्या प्रवासानंतर ट्रॅकच्या बाजूला मोठा स्फोट झाला. गोळीबार सुरू झाला. खिडकीतून आलेली एक गोळी आमच्या डोक्यावरून गेली. ट्रेनमधील सर्वजण श्वास रोखून खाली वाकले. शेवटी 1 मार्चला टर्नोपिल स्टेशनला पोहोचलो. तेथे मारियाचा पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क झाला. अधिकाऱ्यांनी आम्हाला टर्नोपिल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वसतीगृहात ठेवले. आमच्यासाठी कॉफी, ब्रेड, सूपची व्यवस्था केली.”
बस चालकाने अगोदरच सोडले
“आम्हाला दोघांनाही पाकिस्तान दूतावासाने स्वखर्चाने टर्नोपिल ते रोमानिया बॉर्डरवर बसने पाठवलं. बस चालकाने आम्हाला 15-20 किमी अगोदरच सोडले. तिथून पायी चालत सीमेपर्यंत जायचे होते. ते सीमेवर पोहोचले तेव्हा हजारो लोक होते. आतापर्यंत आम्हाला रोमानिया कॅम्पमध्ये प्रवेश मिळालेला नाही. मी बुधवारपासून भारतीय दूतावासाशी संपर्क साधत आहे पण प्रतिसाद मिळत नाही. मायनस तापमान आहे. मला ताप आहे आणि माझे शरीर खूप दुखत आहे. अद्याप कोणतीही वैद्यकीय मदत मिळालेली नाही. स्थानिक लोक विद्यार्थ्यांना मदत करत आहेत” असं देखील अंकितने म्हटलं आहे. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिले आहे.