मुंबई,दि.28: शिवसेना (Shivsena) वादावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) परखड मत व्यक्त केलं आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णय दिला आहे. पण, ‘यापुढे पक्षातील विवादावर निवडणूक आयोग निर्णय घेणार हा जो संदेश या निर्णयातून गेला आहे तो चुकीचा आहे’ असं परखड मत वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
शिवसेना कुणाची? या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर राखला जाईल का या बाबत शंका आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
‘संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची तटस्थता जपली होती, त्यांच्यावर शिंतोडे उडवले जाणार नाही याची दक्षता घेतली होती. परंतुस निवडणूक आयोगाने स्वतःच्याच अधिकाराखाली Symbol Order 1968 जी काढली त्यामध्ये Section 15 प्रमाणे एखाद्या पक्षात जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हांला हस्तक्षेप करता येतो असे प्रावधान केले. हे Syambol Order मधील section 15 संविधानिक आहे की नाही याची तपासणी करण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाला यानिमित्ताने आली होती. परंतु दुर्दैवाने ती तपासणी झाली नाही आणि निवडणूक आयोगास शिवसेनेच्या प्रकरणात निर्णय घ्या असे सांगण्यात आले. संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची जी तटस्थता जपली होती दुर्दैवाने या निर्णयामुळे ती धोक्यात आली आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘यापुढे पक्षातील विवादावर निवडणूक आयोग निर्णय घेणार हा जो संदेश या निर्णयातून गेला आहे तो चुकीचा आहे असे मी मानतो. निवडणूक आयोगाला आपण Frankenstein करायला निघालो आहोत का अशी दाट शक्यता निर्माण होते, असं म्हणत आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली.
यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडी करत आहे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.