नागपूर,दि.5: OBC Mahamorcha: सकल ओबीसी समाज 10 ऑक्टोबरला महामोर्चा काढणार आहे. मराठा समाजातील कुणबी समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र सरसकट मराठा समाज ओबीसीत येणार असल्याचा दावा ओबीसी नेते करत आहेत. महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबरला शासन निर्णय काढला आहे. या शासन निर्णयामुळे सरसकट मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येत आहे, त्यामुळे मूळ ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. या शासन निर्णयाविरुद्ध ओबीसी समाजाने तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
सह्याद्री अतिथीगृह इथे सकल ओबीसी संघटनांची मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरनें ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षणाला धक्का लागणार आहे. मराठ्यांना कुणबी (ओबीसी) म्हणून दाखविणाऱ्या शासननिर्णयाच्या विरोधात 10 ऑक्टोबर रोजी नागपूरात सकल ओबीसी समाजाचा भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियमपासून होऊन संविधान चौकापर्यंत जवळपास तीन किलोमीटर अंतरावर काढली जाणार आहे.
राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानंतर राज्यात 12 ओबीसी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत, आपल्याला भविष्य उरले नाही ही असुरक्षिततेची भावना समाजात निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी दोन समाजात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.यामुळे महाराष्ट्रात दरी निर्माण झाली आहे. म्हणूनच हा शासन निर्णय रद्द करावा अशी आमची मागणी आहे. सरकारला आम्ही विनंती केली आहे, 10 ऑक्टोबरला मोर्चा निघणार आहे तोपर्यंत निर्णय घ्यावा आणि सरकारचा प्रतिनिधीने मोर्च्यात येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी असे वडेट्टीवर म्हणाले.








