सोलापूर,दि.११: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. सोलापूर शहरात बंदला प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील अनेक ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या बंदला सकाळपासून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतूकीवर परिणाम होत आहे.
सोलापूर शहरातील जुळे सोलापूर, आसरा, कुमठा नाका, सत्तर फूट, नीलम नगर, अशोक चौक, दत्त चौक सात रस्ता आदी परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने चालू ठेवली आहेत. बाजार समितीत सर्व व्यवहार चालू आहेत.

शहरातील पार्क चौक, नवी पेठ परिसरात सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. शहरातील इतर भागात सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत.


सांगलीत बंदला चांगला प्रतिसाद
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमिवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, दैनंदिन व्यवहार बंद करण्यात आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू असून याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.
औरंगाबाद बंद
महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर गुलमंडी भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सातारा, देवळाई, उल्कानगरी, शिवाजीनगर परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद असून जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता इतर व्यवहार बंद आहेत. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाल्याची आवक नेहमी पेक्षा दहा ते वीस टक्क्यांनी कमी आहे.
नागपुरात बंद
नागपुरात विविध भागात काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले. बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली. मात्र, व्यापाऱ्यांची या आंदोलनाला पाठ दाखवली आहे.
मुंबई बंद
काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.