सोलापूर,दि.27: NIA-ATS Raids On PFI: दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (Maharashtra ATS) मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. सोलापूर (Solapur) आणि औरंगाबादमधून (Aurangabad) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front Of India- PFI) कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी झाली होती. जवळपास 100 जणांना अटक करण्यात आली होती.
महाराष्ट्रात (Maharashtra) एनआयए आणि एटीएसकडून संयुक्त कारवाई करण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा कारवाई केली.
सोलापूरमधून एकजण ताब्यात
सोलापूरमध्येही PFI विरोधात NIA ने कारवाई केली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सोलापूरमधून NIA ने एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीला NIA च्या पथकाने आपल्या सोबत चौकशीसाठी दिल्लीला नेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबादमध्ये कारवाई
औरंगाबाद एटीएस आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पीएफआयचे आणखी 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात घेतले. एकाच वेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. औरंगाबाद पोलीस आणि एटीएसकडून रात्रभर छापेमारीची कारवाई सुरू होती.
देशविरोधी कारवायांचा आरोप
पीएफआय ही संघटना देशविरोधी कारवायात असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी ठेवला आहे. 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा कट आखला असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले.