मुंबई,दि.1: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठं विधानं केलं आहे. भाजपाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन सर्वांना धक्का दिला. अशातच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून आणखी धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न केल्याने भाजपाचे अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष संपल्याची चिन्हे दिसत आहेत. शिदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन अद्याप 24 तासही उलटले नाहीत, तोपर्यंत हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, “भारतीय जनता पक्षालाही माहीत आहे, की हा प्रासंगिक करार आहे. हे सरकार किती दिवस टिकणार आणि २०२४ साली ते पुन्हा निवडून येतील किंवा नाही, याबाबत शंका आहे. मला तर वाटतंय २०२४ आधीच निवडणुका होतील, त्यावेळी हे सगळे निवडून येतील किंवा नाही, याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्यामुळे यांच्यावर किती अवलंबून राहायचं हे, भारतीय जनता पक्ष ठरवेल,” असंही पाटील म्हणाले.