राष्ट्रवादीचे जयंत पाटील केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल म्हणाले

0

बुलडाणा,दि.२८: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपा नेते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची स्तुती केली आहे. या देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं काम सोडलं तर मोदी सरकारचं कुठलंही काम पैलतिरापर्यंत पोहोचलं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुलडाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान केली. “आता गडकरींच्या मागेही कुणीतरी लागल्याचं दिसतंय” असं म्हणत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर भाजपामध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, बुलडाण्यातील कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विविध समस्यांबाबत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जीवनावश्यक वस्तूंवर कर नव्हता, पेट्रोल-डिझेलने उच्चांक गाठला नव्हता, असे पाटील यावेळी म्हणाले. एकेकाळी ४०० रुपयांना मिळणारं सिलेंडर १२०० रुपयांपर्यंत महाग होईल, असं कधीही वाटलं नसल्याचं पाटील म्हणाले.

जनमताविरोधात राज्यांमधील सत्ता उलथवून भाजपाने मतदारांचा आणि भारतीय लोकशाहीचा अवमान केला आहे. आगामी निवडणुकीत हाच निवडणूक कार्यक्रम भाजपा जनतेसमोर मांडणार का? असा सवाल पाटील यांनी केला आहे. राज्यातील शिंदे-भाजपा सरकारलाही पाटील यांनी लक्ष्य केले आहे. “हे सरकार देवाणघेवाणीतून निर्माण झालं आहे. या देवाणघेवाणीचा आकडा ५० खोक्यांपर्यंत गेला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे रुचेल असं वाटत नाही”, असं पाटील यांनी म्हटलं आहे. या सरकारने मतदारांचा अपेक्षाभंग केल्याने पुढील निवडणूक सोपी नसेल, असं भाकितही त्यांनी वर्तवलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here