Narendra Modi On Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक

0

मुंबई,दि.२३: Narendra Modi On Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अपात्र होणार आणि अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अजित पवार हेच पुढचे मुख्यमंत्री असणार, असे अजितदादा समर्थकांकडून ठासून सांगितले जात आहे. त्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एकनाथ शिंदे यांनी कालच दिल्लीत सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिंदेंच्या कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधला होता. मात्र, विरोधी गोटातून हा एकनाथ शिंदे यांना निरोप समारंभ असल्याची चर्चा सुरु करण्यात आली. एकूणच हे सगळे राजकीय वातावरण एकनाथ शिंदे यांच्यासाठी फारसे अनुकूल म्हणता येणार नाही. मात्र, या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Narendra Modi On Eknath Shinde | नरेंद्र मोदींने केले एकनाथ शिंदे यांचे कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर आपला सगळा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. एकनाथ शिंदे यांच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिप्लाय दिला आहे. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाची मुक्तकंठाने तारीफ केली आहे. महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटून मला आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे, असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी इतकी जवळीक एकनाथ शिंदे यांनाच साधता आली आहे. अशातच पंतप्रधान मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्याने साहिजकच त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील वजन आणि प्रतिष्ठा आणखी वाढली आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. नरेंद्र मोदी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार एकनाथ शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली. धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आस्थेवाईकपणे चर्चा केली.

कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली. गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here