नागपूर,दि.१३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी धर्म, आरएसएसवर मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणतीही व्यक्ती आपल्यासमोर आदर्श नाही. भगवा ध्वज आपल्यासमोर आदर्श आहे. आपल्या समोर तत्त्व आहेत आणि तत्त्वांमध्ये जर काही चिन्ह असेल तर तो भगवा ध्वज आहे, असे प्रतिपादन मोहन भागवत (Mohan Bhagwat News) यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
काय म्हणाले मोहन भागवत? | Mohan Bhagwat
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, रामभक्त हनुमान हे आमचे आदर्श आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. आपल्याला भारत विश्वगुरू बनवायचा आहे. संपूर्ण जगाला या देशाची गरज आहे. आपले जीवन देशासाठी आहे. आपण जे काही कमावू, त्याचा देशासाठी त्याग करायला हवा. नव्या पिढीची आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. आपण आपल्या विचारांवर ठाम असले पाहिजे, आपल्या कर्मावर आपण भर दिला पाहिजे, असेही मोहन भागवत म्हणाले.
![Mohan Bhagwat News](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2023/01/1000323792.jpg)
सनातन धर्माची उन्नती व्हायला हवी | Mohan Bhagwat News
सनातन धर्म हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे. जेव्हा जेव्हा हिंदू राष्ट्राची प्रगती होते, तेव्हा ती धर्माच्या प्रगतीसाठी असते. आता सनातन धर्माची उन्नती व्हायला हवी. भारत नेहमीच अमर आणि अपराजित राहिला आहे. धर्म हे या देशाचे सत्व आणि सार आहे. धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे, त्याशिवाय जीवन चालू शकत नाही, असे मोहन भागवत म्हणाले.
धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती, पंथ, संप्रदाय नाही
धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती, पंथ, संप्रदाय नाही. तर धर्म हा मूल्य, सत्य, करुणा, शुद्धता आणि तपस्या यांप्रमाणे अतिशय महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी शेकडो वर्षांपासून अनेक आक्रमणे सोसूनही भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. कारण तेथील लोकांनी धर्म सत्व जपले आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले.