दि.११: लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. सोलापुरात बाजार समितीत व्यवहार सुरू आहेत. अनेक नाशिक बाजार समिती बंद आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते बंदचे आवाहन करताना दिसत आहेत. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या आजच्या ‘महाराष्ट्र बंद’वर मनसेनं जोरदार टीका केली आहे. हा सरकारपुरस्कृत बंद असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
‘आता बंद पुकारणारे महाविकास आघाडीचे खासदार संसदेत शेतकरी विरोधी विधेयक मंजूर होत असताना शेपूट घालून का बसले होते?,’ असा सवाल मनसेनं केला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘लखीमपूरला घडलेली घटना दुर्दैवीच आहे. त्याचा निषेध झालाच पाहिजे, पण ज्या कृषी कायद्यांमुळं हे सगळं घडतं आहे, ते कृषी कायदे होत असताना संसदेत महाविकास आघाडीचे खासदार संसदेत शेपूट घालून का बसले होते? शिवसेनेच्या खासदारांची थोबाडं बंद का होती? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत अनुपस्थित का होते?,’ अशी प्रश्नांची सरबत्तीच संदीप देशपांडे यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश मध्ये जी घटना झाली ती दुर्दैवी आहेच त्याचा निषेध व्हायलाच हवा. पण मा. वि. अ. चे खासदार जेंव्हा संसदेत शेतकरी विरोधी बिल मांडलं जात होतं तेंव्हा शेपूट घालून का बसले होते.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 11, 2021
‘लॉकडाऊनमुळं आज लोकांचं कंबरडं मोडलंय. कसेबसे ते सावरू पाहताहेत. सणासुदीत थोडाफार व्यापार होतो, नेमका त्याच वेळी हा सरकारपुरस्कृत बंद केला जातोय. दादरसारख्या भागांत स्वत: पोलीस फिरून दुकानं बंद करताहेत. ही कुठली पद्धत आहे आणि हे कुठलं राज्य आहे,’ असा संतापही देशपांडे यांनी व्यक्त केला.