जालना,दि.19: Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा 4 जूनपासून उपोषण करणार आहेत. लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालादिवशीच मनोज जरांगे उपोषण करणार आहेत. उपोषण स्थळी राज्यातील गरजवंत समाज एकत्रित जमणार आहे.गरीब समाजासाठी माझा लढा सुरू आहे. या लढ्यात सर्वच समाज एकत्रित येणार आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
मी जातीवाद केलेला नाही | Manoj Jarange Patil
“मी महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. कोणाला निवडून आणायचं हे समाजाने ठरवायचं आहे. ही आता निवडणुका आहेत म्हणून आपल्याकडे येतात आणि पुन्हा गुरगुर करतात. आपली मुल डोळ्यासमोर ठेऊन मतदान करा, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मी जातीवाद केलेला नाही. त्यांनीच आम्हाला हिणवलं आहे, असा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर जरांगे पाटील यांनी केला. आजपासून एक महिना शांत रहा, कोण काय करत आहे यावर लक्ष ठेवा, असा सल्लाही मराठा समाजाला दिला.
आंदोलनाचा फायदा
माझ्या आंदोलना मागे कोणीही नाही. फुस लावण्याचा तर प्रकार लांबच राहिला. काहीही कारणं जोडू नका. इथ मराठा एक झालेला आहे. आंदोलन हे सरकारच्या फायद्याचे होत असतात. मात्र माझे आंदोलन समाजासाठी आहे. त्याचा फायदा समाजाला झाला आहे. सरकार आणि विरोधी पक्षाला कुठलाच फायदा झाला नाही, असे ते म्हणाले.