मुंबई,दि.२२: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस म्हणजेच रविवार, सोमवार आणि मंगळवारी राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना ‘अलर्ट’
मंगळवारी खालील जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे:
• मराठवाडा: परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली.
• पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा.
• विदर्भ: गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर.
• कोकण: पावसाचे संकट असतानाच दुसरीकडे रायगड, ठाणे आणि मुंबईत उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
शेती पिकांचे अतोनात नुकसान
१८ आणि १९ मार्च रोजी झालेल्या गारपिट आणि पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात द्राक्ष, कांदा, मका आणि गहू या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर (गेवराई बाजार परिसर) भागातही वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत.
“हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावला आहे. गहू आणि ज्वारीची पिके आडवी झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार असून, शेतकरी आता आर्थिक कोंडीत सापडला आहे.”
तात्काळ मदतीची मागणी
नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून, शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.








