मुंबई,दि.17: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात मोदी-शहांविरुद्ध असलेल्या लाटेपेक्षा मोठी लाट देवेंद्र फडणवीस यांच्या ढोंग आणि भंपकपणाविरुद्ध आहे असे राऊत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. लोकं त्यांचा तिरस्कार करत असून 4 जूनच्या निकालातून सर्वकाही स्पष्ट होईल, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही समाचार घेतला. केंद्रात, राज्यात सत्ता असताना आणि महापालिकेवरही सरकारचा प्रशासक असताना घाटकोपर दुर्घटनेचे खापर शिवसेनेवर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या फडणवीस यांचा खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.
प्रफुल्ल पटेल हे दाऊदचे हस्तक असल्याचा आरोप स्वत: पंतप्रधानांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो इक्बाल मिर्चीच्या एका साथिदारासोबत आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी त्यावर आधी बोलावे. तसेच ज्या भ्रष्टाचाऱ्यांना भाजप, मोदी तुरुंगात टाकणार होती त्यांच्यासोबतच आता मोदी मंचावर एकत्र येत आहेत, फोटो काढत आहेत, चहापान करत आहेत आणि जेवणावळीही उठवत आहेत. असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
त्यांच्यासोबतच किसिंग सुरू…
ज्या यामिनी जाधव, यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली फडणवीस यांनी मांडली होती त्यांच्याच प्रचाराला, अर्ज भरायला ते जात आहेत. चक्की पिसिंग… चक्की पिसिंग म्हणत अजित पवारांना तुरुंगात टाकणार होते, पण आता त्यांच्यासोबतच किसिंग सुरू आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.
ते पुन्हा येत आहेत…
नरेंद्र मोदींना मुंबईत, महाराष्ट्रात येऊन 25-30 सभा घ्यावा लागताहेत याचा अर्थ तुम्ही 10 वर्षात काहीच काम केलेले नाही. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी ते पुन्हा येत आहेत. विशेष म्हणजे मोदी-शहांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणत पक्ष स्थापन केला ते आता महाराष्ट्राच्या शत्रुंबरोबर व्यासपिठावर बसतील. त्यांच्यावर कौतुकाची फुले उधळतील. हे चित्र महाराष्ट्राला याची देहा, याची डोळा पाहू द्या, असा टोला राऊत यांनी राज ठाकरे यांनी लगावला.