‘राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच’ भाजपा आमदाराचे मोठे वक्तव्य

0

सातारा,दि.१६: राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत असे वक्तव्य भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे. कुणाला सोबत घ्यायचे आणि कुणाला सोडायचे हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच माहिती आहे असेही गोरे म्हणाले. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट बरोबर घेत भाजपाशी हातमिळवणी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी या सरकारमधील मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आलं. यावेळी अनेक आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी करून घेतल्याने शिंदे गटातील आमदारांसह भाजपामध्येही नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. तसेच पूर्ण बहुमतातलं सरकार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी करून का घेतलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात भारतीय जनता पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे आणि जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीवेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी म्हटलं की, राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत. आपल्या नेतृत्वाला माहिती आहे की, कोणाला बरोबर घ्यायचं आणि कधी सोडायचं?

जयकुमार गोरे म्हणाले, “आपल्या भारतीय जनता पार्टीने घेतलेला निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. आपलं नेतृत्व खूप सक्षम आणि खूप विचारी आहे. त्या नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला आपल्याबरोबर घ्यायचं, कोणाला सोडायचं, कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं आणि कोणाला कधी सोडायचं? हे सगळं आपल्या नेतृत्वाला माहिती आहे. तसेच या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत.” आमदार गोरे हे वक्तव्य करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत होते का? यावर आता चर्चा सुरू आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here