‘जरागेंचा हा लढा मराठा आरक्षणासाठीचा आहे की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी’ नितेश राणे

0

मुंबई,दि.25: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझा उपोषणा दरम्यान मृत्यू झाल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका’ असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. मराठा आंदोलन संपवण्याचा प्रयत्न फडणवीस करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. आंदोलन संपवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची माणसं आहेत. हे सर्व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.

जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मनोज जरागेंचा हा लढा मराठा आरक्षणासाठीचा आहे की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी असा सवाल नितेश राणे यांनी जरांगेंना केला आहे.

जरांगेंच्या हाती कुणाची स्क्रिप्ट आहे, त्यांच्या स्क्रिप्टमधून आता तुतारीचा वास येऊ लागलाय,अशी टीका नितेश राणे यांनी जरांगेवर केली आहे. तसेच हा लढा मराठा समाजाचा असेल तर त्यांनी तो समाजापर्यंतच मर्यादीत ठेवावा असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे फक्त देवेंद्र फडणवीसांवर का टीका करतात? उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यावर का कधीच टीका करत नाहीत, असे नितेश राणे म्हणाले. जरांगे सागर बंगल्यावर येणार तर आम्ही काय गप्प बसणार का? आम्हीपण मराठे आहोत. जरांगे येत असतील, तर त्यांच्यासमोर आमची भिंत उभी असेल, ती क्रॉस करुन दाखवा, मग पुढचे पुढे बघू,’ असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here