मुंबई,दि.5: ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर (Journalist Girish Kuber) यांच्यावर नाशिकमध्ये (Nashik) होत असलेल्या साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) शाईफेक करण्यात आली आहे. संभागी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) दोन जणांकडून त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं.
गिरीश कुबेर (Girish Kuber) यांनी लिहिलेल्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा संभाजी ब्रिगेडचा (Sambhaji Brigade) आरोप आहे. त्याचा निषेध म्हणून कुबेरांवर शाई फेकल्याचं ब्रिगेडकडून सांगण्यात आलं. या संपूर्ण कृत्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी स्वीकारली. आम्ही केलेल्या कृत्याचा आम्हाला कोणताही पश्चाताप वाटत नाही. कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असं रोटे पाटील यांनी म्हटलं.
संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कृत्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले. आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आले असते. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिले असेल. छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह लिहिले गेले असेल आणि शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजही आमचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी लिहीत असेल बोलत असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस सहन करणार नाही, असे दरेकर यांनी म्हटले आहे.