नाशिक,दि.30 : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाला करतानाच भुजबळांनी अधिकार नसतानाही नियोजन निधीचं वाटप केलं. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली. त्यामुळे कांदे-भुजबळ वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांवर जोरदार हल्ला चढवला. भुजबळ हे केवळ भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थीच नाही तर प्राचार्य आहेत. भुजबळांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. गुन्हेगार कधीच गुन्हा केला नाही हेच सांगत असतो, असं कांदे म्हणाले.
अक्षय निकाळजे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा तपास पोलीस आयुक्त करतील. मुंबईच्या टेकचंदानी या व्यापाराला भुजबळांच्या बाजूनं श्रीलंकेवरून धमकीचा फोन आला होता. भुजबळांची ही अशी पार्श्वभूमी आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
12 कोटी निधी आला यातील 10 कोटी रुपये भुजबळांनी ठेकेदारांना वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त 2 कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. अधिकार नसताना छगन भुजबळ यांनी वाटप करून गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद काढून घेतलं पाहिजे. भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले?, असा सवाल करतानाच भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचं भांडण नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.