जळगाव,दि.15: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जोरदार टीका केली आहे. माझ्यात क्षमता होती म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतो, पोरीबाळीच्या नादी लागून हे होत नाही. पोरीबाळीच्या नादी लागून कुणी मुख्यमंत्री होत नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावात हल्लाबोल केला आहे. अलीकडचं राजकारण देशाचं नाही तर द्वेषाचं होत आहे. तुमच्या विरोधात बोलले की लगेच मागे लागले जाते, असं देखील खडसे म्हणाले.
यावेळी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, ज्यांना आपण मोठं केलं तेच आपल्या विरोधात गेले. यांना हिसका दाखवायला हवा, असं म्हणत खडसेंनी भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला.
एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले की, काहीतरी करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. ‘हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे’ असं खडसे म्हणाले. सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही ते म्हणाले. चांगलं काम कसं असतं हे बारामतीला गेल्यावर पाहायला मिळते. शरद पवार यांच्यावर सर्वच पक्षातून प्रेम करणारे लोक आहेत. शरद पवार यांचं नेतृत्व मी मान्य केले आहे. कोणत्या क्षणाला कोणता निर्णय घ्यावा हे त्यांच्याकडून शिकायला मिळते. शरद पवार दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असं ते म्हणाले.
खडसे म्हणाले की, दोन वर्षपूर्वी मी पुन्हा येणार असे फडणवीस म्हणत होते. पवार यांची खिल्ली उडवत होते. मात्र शरद पवार यांनी एका रात्रीत चित्र बदलले. हे फक्त पवार करूच शकतात, असं खडसे म्हणाले.
जाणता राजा
यावेळी खडसे यांनी शरद पवारांचा उल्लेख महाराष्ट्राचे जाणते राजे असा केला. ते म्हणाले की, पवार हे अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलणारा नेते आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, कोणी पहिलवान बाकी नाही. पण पवारांनी एका रात्रीतून चित्र बदललं. मला स्वप्नांतही वाटत नव्हतं की हे तीन पक्ष एकत्र येतील. पण त्यांनी करून दाखवलं, असंही खडसे म्हणाले.
स्वतंत्रसेनानी आणि माजी आमदार स्व. मुरलीधर अण्णा पवार यांच्या धरणगाव तालुक्यातील चांडसर येथील पुतळ्याचं शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याच अनावरण झालं. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.