अजित पवार ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री होणार? मंत्री धर्मरावबाबा अत्राम म्हणाले…

0

मुंबई,दि.२४: अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अपात्र होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार हे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहू लागले आहेत. परंतु आता ते लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने केला जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यापासून ते अजित पवारांच्या गाटातील आमदारांपर्यंत अनेकांनी असा दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांचा ६४ वा वाढदिवस होता. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या चौकांमध्ये होर्डिंग्स लावले होते. या होर्डिंग्सवर अजित पवारांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला होता.

दरम्यान, अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील दोन दिवसांपूर्वी एक सूचक ट्वीट केलं होतं. “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…”, अशा कॅप्शनसह मिटकरी यांनी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीश्वरांची इच्छा असल्याचं म्हणून या चर्चांचा धुरळा उडवून दिला. आता राज्यातील एक महत्त्वाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनीही अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावरून भाष्य केल्याने पडद्यामागे काय चाललंय? अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठीची ही वातावरण निर्मिती तर नाही ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

मंत्री धर्मरावबाबा अत्राम म्हणाले…

दरम्यान, या सगळ्या राजकीय चर्चांवर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी भाष्य केलं आहे. अत्राम यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. मंत्री अत्राम यावेळी म्हणाले, आधीच्या सरकारच्या काळात आमदारांच्या निधीचं काम सुरू होतं. मोठी अडचण नव्हती, परंतु काही स्थगित्या होत्या. आता सगळं सुरळीत झालंय. आताची परिस्थिती वेगळी आहे. कारण आता राज्यात राजकीय परिवर्तन झालं आहे. निधी येतोय, त्यामुळे विकासकामं होत आहेत.

दरम्यान, अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचे जे राजकीय दावे केले जात आहेत, त्यावर प्रश्न विचारल्यावर धर्मरावबाब अत्राम म्हणाले, आता ते होईल तेव्हा होईल. ऑगस्ट महिन्यात काही परिवर्तन घडेल का? असा प्रश्न विचारल्यावर, धर्मरावबाबा अत्राम म्हणाले, तसं झालं तर चांगलंच आहे. परंतु सध्या जे सरकार अस्तित्वात आहे ते चांगलं आहे. भविष्यात काही घडामोडी घडतील की नाही, ते सांगू शकत नाही.

मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीश्वरांची इच्छा असल्याचं म्हणून या चर्चांचा धुरळा उडवून दिला. आता राज्यातील एक महत्त्वाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनीही अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावरून भाष्य केल्याने पडद्यामागे काय चाललंय? अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठीची ही वातावरण निर्मिती तर नाही ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here