पुण्यातील घोषणाबाजीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तीव्र संताप

0

मुंबई,दि.24: पुण्यातील घोषणाबाजीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. एनआयएच्या कारवाईच्या विरोधात पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती.

आंदोलनादरम्यान पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. पुण्यातील पीएफआयच्या निदर्शनातील घोषणाबाजीवरुन नवा वाद उफाळला आहे. राजकीय नेत्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कारवाईचा इशारा दिला आहे. पुणे पोलिसांच्या एफआयआरमध्ये मात्र पाकिस्तान झिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणेचा उल्लेख नाही.

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय नेत्यांना एनआयए आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली आहे. याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काही समाजकंटकांनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर, अशा घोषणा देण्यात आल्या. याचा व्हिडिओदेखील जबरदस्त व्हायरल होत आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे, की “पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.”

याप्रकरणी संबंधित समाजकंटकांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पुण्यातील या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात, भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करू, घोषणा देणारे जिकडे असतील, तिकडून त्यांना शोधून काढू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. एढेच नाही, तर पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचे षडयंत्र रचण्यात येत होते, अशी माहितीही त्यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here