दि.२३: खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी पुन्हा राज ठाकरेंना (Raj Thackeray) आव्हान दिले आहे. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. पुण्यातील सभेत राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द करण्याचे कारण सांगितले. आपल्या विरोधात महाराष्ट्रातून रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसे सापळ्यात अडकवायचे त्यासाठी मदत केली. त्या सापळ्यात आपण अडकू नये, म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, असं स्पष्टीकरण मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या पुण्यातील सभेत दिलं.
जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे.
मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधतोय. जर ते कधी मला एअरपोर्टवर वैगरे भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन, असं बृजभूषण म्हणाले. तसेच उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत ते माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही बृजभूषण यांनी दिला आहे.
राज ठाकरेंचं आता हृदय परिवर्तन झालंय आणि त्यांना अयोध्येला यायचं आहे. राज ठाकरे ज्या कोणत्या उत्तर भारतीय राज्यात जातील, तिथे त्यांना विरोध केला जाईल. माफी मागितल्याशिवाय त्यांना प्रवेश नाही, असं बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.