औरंगाबाद,दि.1 मे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज औरंगाबाद येथे सभा होत आहे. राज ठाकरे यांनी भोंगा हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे असे म्हणत मशिदीवरील भोंगे 3 मे पर्यंत काढावेत अशी भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर अनेक राज्यात भोंग्यावरून वाद सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विनापरवाना भोंगे हटवण्याचा आदेश दिला आहे. भोंग्यासंदर्भात राज ठाकरे यांनी आवाज उठवल्यानंतर मनसे मधील अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. तरीही आजच्या राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेमध्ये मुस्लीम युवकांनी सुद्धा सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहरानजीक असलेल्या वाळूज परिसरातून पाचशे युवक बाईक रॅली घेऊन या सभेमध्ये सहभाग घेण्यासाठी आले आहेत. या बाईक रॅलीमध्ये मुस्लिम युवकांचादेखील मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं आहे. औरंगाबाद येथील राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता. मात्र, त्या अगोदरच मुंबई पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून औरंगाबादच्या दिशेने निघालेले भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घाटकोपर चिराग नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं.