सोलापूर,दि.१६: केतकी चितळे (Ketaki Chitale) प्रकरणावरून सोलापूरात मोठा वाद झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या केतकी चितळे हिचा अभिमानच वाटतो, असे वादग्रस्त विधान रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केले. त्यामुळे सोलापूरात खोत यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. चितळे अटकेत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकीच्या वक्तव्याचे समर्थन केले. सदाभाऊ सोमवारी दुपारी दोन वाजता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रशांत बाबर, विद्यार्थी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सुहास कदम यांच्यासह कार्यकर्ते टाळ मृदुंग घेऊन विश्रामगृहात पोहोचले. सदाभाऊंना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. सदाभाऊंच्या बॉडीगार्डने त्यांना रोखले. बराच वेळ झटापट झाली. बाहेर आल्यानंतर ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध निदर्शने केली
दरम्यान, वातावरण शांत झाल्यानंतर खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केतकी चितळेच्या विधानाचे नाही तर तिने न्यायालयात कोणत्याही वकिलाची मदत न घेता स्वतः आपली बाजू मांडल्याचे आपणांस कौतुक वाटले आणि तिचा अभिमानही वाटला, असा खुलासेवजा दावा केला. चितळे हिने पवारांवर काही बोलले तर तो गुन्हा ठरतो आणि राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाविषयी बेताल विधान केले की तो गुन्हा कसा ठरत नाही, असा सवालही खोत यांनी यावेळी उपस्थित केला.