औरंगाबाद,दि.29: शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटातील 15-16 आमदार संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे.
शिंदे गटातील पंधरा ते सोळा आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ते म्हणाले की, मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये उद्रेकता वाढली आहे. त्यांना असं वाटत आहे की, आपण उगीचच मातोश्री आणि उद्धव साहेबांना सोडलं.
आमदारांना या गोष्टीचं वाईट वाटत असावं आणि त्यातूनच हा प्रकार घडत आहे, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, की गेलेल्या सर्व पन्नास आमदारांना मंत्रिपद मिळणं शक्य नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांच्यामध्ये उद्रेकता वाढत आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असा दावा खैरे यांनी केला.