ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज

0

मुंबई, दि.३०: ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे भाजपाने जाहीर केली आहेत. यात महाराष्ट्रातून किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यात आली नाही. अनेक नेते राज्यसभा निवडणुकीकडे डोळे लावून बसले होते. मात्र, काहींच्या पदरी निराशा पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून अशा पद्धतीचे सूर उमटू लागल्याचे सांगितले जात आहे. राज्यातही राज्यसभा निवडणुकीवरून कलगीतुरा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवारीची नावे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना टोला लगावण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांना राज्यसभा उमेदवारीवरून खोचक टोला लगावला आहे. तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, असे उपहासात्मक ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. यासोबत किरीट सोमय्या यांचा एक हसरा फोटोही शेअर केला आहे. 


राज्यसभेच्या सहा जागांकरिता १० जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि  राज्याचे माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी दिली आहे.  काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमधील नेते आणि सुप्रसिद्ध उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजप तीन उमेदवार देणार अशी चर्चा होती. कोल्हापूरचे महाडिक यांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने राज्यातील राज्यसभा निवडणुकीला वेगळा रंग चढणार आहे. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाविकास आघाडीविरोधात आंदोलने, पत्रकार परिषदा आणि दौरे करुन भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन टीकेची झोड उठवणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का या चर्चेला पूर्णविराम मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here