सोलापूर,दि.३०: Ajit Pawar Solapur: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार मोहोळ तालुक्यातील अनगर येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. ‘स्वतःचे १४ आमदार टिकवता आले नाहीत. नाशिककरांनी महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात दिली. मात्र, तिथंही तेच… त्याच नागरिकांनी त्यांना नाकारले. आता हेच लोक स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही खटाटोप करत आहेत. हे आपणाला परवडणारे नाही अशांपासून तुम्ही सावधान रहा’ या शब्दात अजित पवारांनी राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
ते मोहोळ तालुक्यातील नगरच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता ही थेट टीका केली आहे. यावेळी बोलताना हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दाम्पत्यावरही टीका केली.
‘यूपी सरकारने निर्णय घेतला असेल. न्यायालयाने सकाळी ६ रात्री १० परवानगी दिली आहे. मग फक्त मशिदीवरचे भोंगे बंद होणार नाहीत. तर गावाकडं हरिनाम सप्ताह, भजन कीर्तनं, वाघ्यामुरळी कार्यक्रम असतात. हेदेखील बंद होतील. हेच भोंगावाले मागच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या बाजूने सभा घेत फिरत होते. काय झालं कुणास ठाऊक. त्यांनी आता उलटी पाटी लावली आहे. त्यांच्यामुळे राज्यातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येणार आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवा’ असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.