मुंबई,दि.24: राज्य सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या शासन आदेशांच्या संख्येचा मुद्दा उपस्थित करत भाजपाने (BJP) राज्यपालांना यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा फडकावल्याने अस्थिर झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या शासन आदेशांच्या संख्येचा मुद्दा उपस्थित करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपाने केली आहे. मात्र भाजपाने यासंदर्भात राज्यपालांना पत्रा पाठवून विनंती केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.
राज्यामध्ये बहुमताचं सरकार असून सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं अजित पवारांनी भाजपाने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर भाजपाने पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे शिंदे बंडप्रकरणात उडी घेत राज्यपालांना महाविकास आघाडीच्या शासन आदेशांच्या धडाक्याविरोधात पत्र पाठवलं. प्रवीण दरेकर यांनी पाठवले पत्र भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल कोश्यारी यांना पक्षाच्यावतीने हे पत्र पाठवलं आहे.
या पत्रामध्ये भाजपाने महाविकास आघाडी सरकार राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्याने घाईघाईत शासन आदेश जारी करत असून यासंदर्भात संशय घेण्यास वाव असल्याचं म्हटलंय. ज्या वेगाने शासन आदेश जारी केले जात आहेत ते पाहता यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं अशी मागणी भाजपाने केलीय.पत्रातसध्याची राज्यातील स्थिती पाहता हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्यपालांकडे भाजपाने केली आहे. अस्थिर स्थिती पाहून महाविकास आघाडी सरकार अंदाधुंद निर्णय घेत आहे असा आरोप भाजपाने राज्यपालांना पाठवलेल्या या पत्रामधून केलाय. घाईघाईनं शासन आदेश जारी होत आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असं दरेकर यांनी पक्षाची बाजू मांडताना म्हटलंय. राज्यातील राजकीय स्थिती तीन दिवसांमध्ये अत्यंत अस्थिरतेची झाली आहे. दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारने 160 हून अधिक शासन आदेश काढलेले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली काढलेले जीआर संशय वाढवणार आहेत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
अजित पवार म्हणाले
याच मुद्द्यावर महिला पत्रकाराने, “एवढे सारे मंत्री बाहेर असताना जीआर कसे पास होत आहेत?,” असा प्रश्न विचाला. हा प्रश्न ऐकून अजित पवारांनी प्रश्न विचारणाऱ्या महिलेला मंत्र्यांची यादीच ऐकवली. “कोण एवढे मंत्री बाहेर आहेत? अजित पवार इथे आहे. उद्धव ठाकरे इथे आहेत. वळसे-पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण सगळेच तर इथे आहेत,” अशी यादीच अजित पवारांनी ऐकवत प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत जीआरसंदर्भातील निर्णय झाल्याचं जराश्या संतापलेल्या स्वरामध्येच सूचित केलं.