अजित पवार यांनी सांगितले राज्य सरकार कधी कोसळणार

0

पुणे,दि.१३: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला आहे. यात भाजपा आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अजूनही खातेवाटप मात्र झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे. पुण्यात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवतानाच अजित पवार यांनी नवं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का? या प्रश्नावर देखील सूचक वक्तव्य केलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केलेल्या एका विधानाचा यावेळी अजित पवारांनी समाचार घेतला. “बंड करताना थोडाजरी दगा फटका झाला असता तर…मी शहीद होण्याचा धोका होता, मी शहीद झालो असतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवारांनी खोचक टिप्पणी केली आहे. “त्यांच्या मनात अशी भिती का यावी? ते राजकीय शहीद झाले असते की खरोखर शहीद झाले असते ते कसं सांगावं? पण राज्यातल्या जनतेला या प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही”, असं अजित पवार म्हणाले.

आत्तापर्यंत एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा सांगितलेला असताना आपणच खरी शिवसेना असल्याचा देखील दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत शिंदे गटाचं पहिलं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “तो त्यांचा अधिकार आहे. तो विषय न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर आहे. कुणी कुठे कार्यालय काढायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण कार्यालय काढल्यानंतर तिथे लोक सुद्धा भेटायला यायला पाहिजेत. लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे. लोक बघत आहेत. यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी फोडाफोडी केली की जनतेसाठी केली हे जनता ओळखते”, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, याआधी ठाकरे सरकारच्या काळात भाजपाकडून सरकार कोसळण्याचे मुहूर्त दिले जात होते. मात्र, आता अजित पवार यांनी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकेल का? या प्रश्नावर सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “कुणाचंही सरकार आलं, तरी जोपर्यंत १४५ चा जादुई आकडा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता, तोपर्यंतच ते सरकार टिकत असतं. आत्ताचा विचार करता ज्या दिवशी ते १४५ चा आकडा पूर्ण करू शकणार नाहीत, त्या दिवशी हे सरकार कोसळेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here