दि.19: सुनील मित्तल यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. देशात नुकताच स्पेक्ट्रमचा लिलाव झाला. देशात 5G सेवा लवकरच सुरू होणार आहे. देशात 5जी सेवा सुरु करण्यासाठी तयारी करण्याचे आदेश केंद्र सरकारने कंपन्यांना दिले आहेत. यावेळी या कंपन्यांना सरकारने 5जी स्पेक्ट्रमची असाईनमेंट लेटर दिली आहेत. काही दिवसांपूर्वीच या स्पेक्ट्रमचा लिलाव झाला होता, त्यानंतर लगेचच असाईनमेंट लेटर आल्याने एअरटेल संस्थापक मालक हैराण झाले आहेत.
एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी गुरुवारी मोठे आश्चर्य वाटत असल्याचे म्हटले आहे. कोणताही गडबड गोंधळ नाही, फॉलो अप घ्यावा लागला नाही, या टेबलवरून त्या टेबलवर जावे लागले नाही आणि कोणतेही मोठे दावे नाहीत. पैसे भरल्यानंतर अवघ्या काही तासांत आमच्या हातात परवानगी पत्र मिळते, हे गेल्या 30 वर्षांच्या माझ्या अनुभवात टेलिकॉम खात्याने कधीच केले नव्हते, असे मित्तल म्हणाले.
दुरसंचार विभागातील माझ्या 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभवात, हे पहिल्यांदाच घडले आहे. केवढा हा बदल! असा बदल जो देशाला बदलू शकेल. स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद, असे मित्तल म्हणाले. भारती एअरटेलने बुधवारी नुकत्याच संपलेल्या 5G लिलावात अधिग्रहित केलेल्या स्पेक्ट्रमच्या देय रकमेसाठी दूरसंचार विभागाला 8,312.4 कोटी रुपये दिले. एअरटेलने चार वर्षे आधीच ही रक्कम भरली आहे. एअरटेल या महिन्याच्या अखेरीस 5G सेवा लाँच करणार आहे.
एअरटेलदेखील ऑगस्टच्या अखेरीस 5जी सेवा सुरु करण्याची तयारी करत आहे. एअरटेल कंपनीने लिलावात 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीमध्ये 19867.8 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले होते. तर रिलायन्स जिओदेखील 5G सेवा सुरु करण्याची तयारी करत आहे. यामुळे एकामागोमाग एक अशा तीन कंपन्या देशभरात ५जी सेवा लाँच करणार आहेत.