लातूर,दि.14: लातूर (Latur) जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या हासोरी या गावात गेल्या दोन दिवसांपासून जमिनीच्या भूगर्भातून गूढ आवाज येत आहे. या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण असून गावकरी रात्र जागून काढत आहेत. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भूगर्भातून जोरदार आवाज आला. दिवसभर थकून आलेले लोक झोपण्याच्या तयारीतच असताना या आवाजाने त्यांची अक्षरश: भीतीने गाळण उडाली होती. हातातल्या वस्तू जिथल्या तिथे टाकत लोकांनी घरातून बाहेर पळून जाणेच सोयीस्कर समजले आहे.
मागील काही दिवसांपासून लातूरमध्ये पावसाची रिपरीप सुरु आहे. पावसाळी दिवसात घरात राहता येईना आणि बाहेर राहणं शक्य नाही अशा विचित्र परिस्थितीत लोक सध्या अडकले आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्यानुसार दिल्ली, नांदेड आणि नागपूरचे भूवैज्ञानिकांचे एक पथक हासोरीत येऊन भूगर्भातील आवाजाचा शोध घेणार आहेत. नांदेडचं एक पथक आज गावात पोहचलं असून पुढच्या दोन दिवसांत दिल्ली आणि नागपूरचे भूवैज्ञानिक हासोरी गावात दाखल होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांनी संबंधित गावाला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “गावात भूकंपाचे छोटे-छोटे धक्के झाल्याचे जाणवले. गावकऱ्यांचं भूकंप आहे, असं म्हणणं आहे. तर तज्ज्ञांचं भूकंप नाही, असं म्हणणं आहे. मधल्या काळात काही तज्ज्ञ येवून गेले. माझ्यासोबत आज काही तज्ज्ञ मंडळी, विद्यापीठाची सर्व शास्त्रज्ञ मंडळी आलेली आहे. 12 सप्टेंबरच्या रात्री दोन थोडे-थोडे धक्के आले. त्या भूकंपाची 2.0 रिश्टल केल अशी नोंद झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याला काय काळजी घेता येईल, यासाठी आम्ही बैठक घेणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार आहे. एकनाथ शिंदे यांनी सर्व आढावा घेवून फोन करायला सांगितलं आहे. मी सर्व आढावा घेवून फोन करणार आहे”, असं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं.
“काही लोकांच्या मनामध्ये भीती आहे. शास्त्रज्ञांनी गावकऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी गावकऱ्यांच्या बऱ्याच शंकांचं निरसन केलं आहे. काय काळजी घ्यावी, ते देखील सांगितलं आहे. जनतेलादेखील चांगलं ज्ञान अवगत झालेलं आहे. जनता सतर्क झाली आहे. पण शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 2 रिश्टल स्केरलचा भूकंप ही सर्वसामान्य गोष्ट आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एका गावात तर या गोष्टी दर आठवड्यात सर्रासपणे घडताना दिसतात. पण आपत्ती व्यवस्थापक पथकासोबत बैठक घेवून काय उपाययोजना करता येतील त्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो”, अशी प्रतिक्रिया आमदार पवार यांनी दिली.