नारायण राणेसारख्या माणसाने महाराष्ट्रातील जनतेला गद्दारी कुणी केली याबाबत शिकवू नये

0

दि.31: नारायण राणेसारख्या माणसाने महाराष्ट्रातील जनतेला गद्दारी कुणी केली याबाबत शिकवू नये. असे म्हणत शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. शिंदे गटातील अनेकांची ईडी चौकशी सुरू होती. ईडीमुळे अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप करण्यात येत होता. ठाकरे गटातील नेते सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. प्रत्येक सभा आणि भाषणात शिंदे गटातील आमदार आणि खासदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला जात आहे. नवीन सरकार स्थापन होऊन आता जवळपास दोन महिने पूर्ण झाली आहेत. पण अजूनही शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर गद्दारी केल्याचे आरोप केले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणेही सातत्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना दिसत आहेत. शिंदे गटाने गद्दारी केली नाही तर, उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना आमदार आणि पक्षाशी खरी गद्दारी केली. त्यांनी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.

शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी नारायण राणेंच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणेसारख्या माणसाने महाराष्ट्रातील जनतेला गद्दारी कुणी केली? याबाबत शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना अक्षरश: हाकलून दिलं होतं. मातोश्रीच्या जीवावर मोठं झालेल्या राणेसारख्या लोकांनी म्याव म्याव करू नये, अशी बोचरी टीका चोथे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राणेंना हाकलून दिलेल्या बैठकीचादेखील उल्लेख केला आहे. ते जालन्यात एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

संबंधित प्रसंगाबाबत बोलताना शिवाजीराव चोथे म्हणाले की, “नारायण राणे आणि मी 1995 साली एका सरकारमध्ये होतो. ते एक मंत्री होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री कसे झाले? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणी कुणाशी गद्दारी केली? हे राणेसारख्या माणसानं महाराष्ट्रातील जनतेला शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक हे वाघ आहेत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे सारख्या वाघाचा बछडा आहेत. त्यामुळे मातोश्रीच्या जीवावर मोठं झालेल्या राणेसारख्या लोकांनी म्याव म्याव करण्याची आवश्यकता नाही.”

“राणे हा शिवसेनेतून हाकलून दिलेला माणूस आहे, हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बाळासाहेबांनी राणेंना अक्षरश: हाकलून दिलं होतं. त्या बैठकीला मी स्वत: उपस्थित होतो. शिवसेनेतून हाकलून दिल्यानंतर त्या माणसानं एक संघटना आणि मग भाजपात प्रवेश केला. त्यामुळे अशा माणसानं उद्धव ठाकरेंबद्दल बोलणं फारसं उचित आहे, असं मला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थानं बछडा आहेत” अशी प्रतिक्रिया शिवाजीराव चोथे यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here