मुंबई,दि.१५: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा एका मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि राज्यातील महायुतीसोबत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या संभाव्य राजकीय घडामोडींमागे पक्षातील आमदारांची तीव्र नाराजी कारणीभूत असल्याचं समजत असून, यामुळे शरद पवार गटात अंतर्गत खळबळ माजली आहे.
निधीअभावी आमदार संतप्त; थेट नेत्यांनाच दिला इशारा!
सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधी बाकांवर बसावे लागल्यामुळे मतदारसंघांतील विकासकामांना खिळ बसली असून हक्काचा निधी मिळेनासा झाला आहे. याच मुद्द्यावरून शरद पवार गटाचे अनेक आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील पक्षाच्या चार आमदारांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे.








