सोलापूर,दि.२८: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस वंचितच्या युतीवर मोठं विधान केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने युती केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मुळातच जागावाचपावरून वाद नव्हता, असे राऊत म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊतांनी वंचित आणि काँग्रेसच्या युतीचेही स्वागत केले. वंचित आणि काँग्रेसच्या युतीचे आम्ही स्वागत करतो. ते आमच्यासोबत नसतील आले तरी जर ते भाजपला रोखण्यास त्यांचा पराभव करण्यास हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही, असे संजय राऊत म्हणाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार गट हे ठाकरे बंधूंसोबत लढणार की नाही, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कार्यकर्त्यांच्या नाराजीबाबत राऊत म्हणाले, ‘जेव्हा दोन पक्षांहून अधिक पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते त्यात ज्यांच्या जागा जातात अशा पक्षांमध्ये त्या त्या प्रभागातील प्रमुख मंडळी अस्वस्थ होणारच. मग ते काँग्रेस असोत किंवा राष्ट्रवादी, शिंदे गट, शिवसेना किंवा अजित पवाकर गट असो. म्हणूनच अजित पवार स्वतंत्र लढत आहे.’
कार्यकर्त्यांना समजवून सांगून ही लढाई मुंबई, महाराष्ट्राची आहे असं सांगितलं तर कार्यकर्ते 100 टक्के उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं ऐकतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. असं करुनही जर एखादा कार्यकर्ता नाराज असला तर त्यालाही नाराजी व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं मत मांडत सध्यातरी युतीत असा उघडपणे राग व्यक्त झाल्याचं दिसत नसल्याचं म्हणत, ‘या क्षणापर्यंत तरी लोकं सस्त्यावर आलेली नाही, जसं शिंदे गटात सुरुय, तिथं तर राजीनामा सत्र सुरुय म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहोत’, असं सांगत शिंदेंना टोला लगावला.








