मांड्या,दि.29: कर्नाटकात ‘हनुमान ध्वज’ हटवण्यावरून वाद उफाळला आहे. रविवारी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात तणाव निर्माण झाला जेव्हा अधिकाऱ्यांनी 108 फूट उंच स्तंभावरून हनुमान ध्वज हटवला. या घटनेनंतर राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये राजकीय वाद सुरू झाला. भाजपा नेते आणि हिंदू कार्यकर्त्यांनी झेंडा हटवल्याचा तीव्र निषेध केला. भाजप आज कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये निदर्शने करणार आहे, त्याअंतर्गत बेंगळुरूच्या म्हैसूर बँक सर्कलमध्येही विशेष निषेध करण्यात येणार आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
रविवारी भारतीय जनता पार्टी, जनता दल सेक्युलर आणि बजरंग दलाचे सदस्य तसेच गावातील आणि आजूबाजूचे लोक झेंडा खाली उतरवण्याच्या विरोधात जमा झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाने ध्वज खांबावरील हनुमान ध्वज (भगवान हनुमानाचे चित्र असलेला ध्वज) राष्ट्रध्वजासह बदलला.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, केरागोडू आणि शेजारील 12 गावांतील रहिवासी आणि काही संस्थांनी रंगमंदिरजवळ ध्वज खांब बसवण्यासाठी पैसे दिले होते. यामध्ये भाजप आणि जेडी(एस) कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
ध्वजाच्या खांबावर हनुमानाचे चित्र असलेला भगवा ध्वज फडकवण्यात आला होता, याला काही लोकांनी विरोध करत प्रशासनाकडे तक्रार केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर कारवाई करत तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ध्वज हटविण्याचे निर्देश दिले होते. ध्वजाचा खांब हटणार या भीतीने शनिवारी मध्यरात्रीपासून काही कार्यकर्ते व ग्रामस्थ तेथे उपस्थित होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वज उतरवल्यानंतर रविवारी सकाळी तणाव वाढला आणि पोलिस आणि आंदोलक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार वादावादी झाली.
आंदोलनादरम्यान काँग्रेसचे स्थानिक आमदार रवी कुमार यांचे बॅनर फोडण्यात आल्याने या वादाला राजकीय वळण लागले. काही आंदोलकांनी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार आणि मंड्या गनिगा येथील काँग्रेस आमदार रविकुमार यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आणि त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी आपल्या मागणीवर ठाम राहून ध्वज खांबाच्या पायथ्याशी भगवा ध्वजासह भगवान रामाचे चित्र असलेले फ्लेक्स बोर्ड लावले.
पोलिसांनी ध्वज हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विरोध झाला आणि आंदोलकांनी ‘जय श्री राम, जय हनुमान’च्या घोषणा दिल्या.
दुपारी पोलिसांनी आंदोलकांना बळजबरीने हटवले आणि कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. यानंतर पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अखेर ध्वजस्तंभावरून हनुमान ध्वज काढून तिरंगा बसवला.
हे योग्य नाही – मुख्यमंत्री सिद्धरामय्या
या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चित्रदुर्गाच्या जिल्हा मुख्यालयात पत्रकारांना सांगितले की, राष्ट्रध्वज फडकवण्याऐवजी भगवा ध्वज फडकवण्यात आला, “हे योग्य नाही.” मी राष्ट्रध्वज फडकवण्यास सांगितले आहे.
मांड्या जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एन चेलुवरायस्वामी यांनी स्पष्ट केले की ध्वज खांबाचे स्थान पंचायतीच्या अखत्यारीत येते आणि राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी घेण्यात आली होती. ते म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता “परंतु त्या दिवशी संध्याकाळी दुसरा ध्वज लावण्यात आला.”








